नारूर (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एक आदिवासी महिला एका गावाची सरपंच झाली आहे. तीन ऑक्टोबरला अलका रमेश पवार यांची नारूर कर्याद नारूर (ता. कुडाळ) या गावाच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे ऐतिहासिक ओळख असलेल्या या गावात इतिहास घडला आहे.
अलका पवार या कातकरी आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानरमारे समाजातील आहेत. जंगल पायथ्याशी मोलमजुरी करून त्या कुटुंबाचा गाडा हाकतात. गाव पॅनेलतर्फे त्या सरपंचपदासाठी रिंगणात होत्या. शिवसेनेतर्फे आणखी एका आदिवासी महिलेचा अर्ज दाखल झाला होता; मात्र तो छाननीत बाद ठरल्याने पवार बिनविरोध निवडल्या गेल्या.
नारूर कर्याद नारूर हे कुडाळ तालुक्यातील रांगणागडाच्या पायथ्याशी वसलेले गाव. या गावात कातकरी आदिवासी गुण्यागोविंदाने राहतात. या गावात सरकारने त्यांना पक्की घरे बांधून दिली आहेत. या वर्षी सरपंचपदाच्या आरक्षणात नारूरसाठी सरपंचपद आदिवासी महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे, कायम गावकुसाबाहेर राहिलेल्या या वानरमारे आदिवासींना आरक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण गावाचे नेतृत्व करण्याची संधी चालून आली. या निवडणुकीसाठी गावाने बनविलेल्या ‘श्री देवी महालक्ष्मी, श्री देव खापरा, जयभवानी ग्रामविकास आघाडी’च्या वतीने ग्रामस्थांनी पवार यांची सरपंचपदाच्या उमेदवार म्हणून निवड केली.
शिवसेनेतर्फे अन्य एक महिला उमेदवार रिंगणात होती; मात्र छाननीमध्ये शिवसेना उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने गाव पॅनेलच्या पवार यांना बिनविरोध सरपंच म्हणून घोषित करण्यात आले. गाव पॅनेलच्या उमेदवाराला सरपंचपद मिळाल्याने नारूरवासीयांनी जल्लोष केलाच; पण त्याहीपेक्षा नारूरच्या आदिवासी बांधवांनी केलेला जल्लोष खूपच वेगळा होता. या वेळी उपस्थित प्रत्येक आदिवासीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
गाव पॅनेलतर्फे पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी सरपंच दीपक नारकर आणि या आदिवासींच्या उत्कर्षासाठी मोठी चळवळ उभी करणारे शोषित मुक्ती अभियानाचे अध्यक्ष उदय आईर यांनी पवार यांचे अभिनंदन केले आहे.